Tuesday, May 12, 2020

आत्मनिर्भर

आत्मनिर्भर 


माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री आठ वाजता लाईव्ह आले होते  तेव्हा सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत होते, lockdown 3 संपून 4 होतं, का जनजीवन हळूहळू चालू करायला माननीय मोदी साहेब सांगतील.

आणि माननीय मोदींनी सांगितलं काय तर...

"आत्मनिर्भर भारत" !!


 इतर साधनसामग्री आतापर्यंत परदेशातून आयात करत होतो ती आता भारतात बनवली जात आहे. मेड इन चायना गोष्टींमध्ये आपण भागवत होतो, त्याच आता भारतात बनायला सुरुवात व्हावी अशी आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे.

आपल्या देशाची आर्थिक घडी जर आपण आपल्या चांगल्या कार्याने बसवू शकणार असू तर याहून चांगली गोष्ट काहीच नाही!!!

 


"आत्मनिर्भर" या शब्दाबद्दल आपण बोलूया... 


निर्भर म्हणजे अवलंबून असणे. आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर अवलंबून असणे.


स्वतःवर अवलंबून असणे म्हणजे काय ?? कुठलाही माणूस एकटा कुठलीच गोष्ट करू शकत नाही. त्याला त्याच्या टिमची किंवा त्याच्या जोडीदाराची साथ लागते.


आत्मनिर्भरता म्हणजे मी जे काम हातात घेतले आहे, मी जे ध्येय ठरवलेलं आहे ते मी माझ्या आत्मविश्वासाच्या बळावर पार पाडू शकेन; ते मी माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन व्यवस्थित यशस्वीरित्या मिळवू शकेन हा विश्वास. त्याच्या बळावर सुरू होणार आपलं सगळं ध्येय प्रेरीत कार्य म्हणजे आत्मनिर्भरता.


या प्रयत्नांनंतर येणार्या यशापयशाची जबाबदारी घेणं म्हणजेही आत्मनिर्भरताच बरं का!!


श्री. विनोबा भावे यांनी आपल्या "गीताई" मध्ये छान श्लोक मांडला आहे.

उद्धरावा स्वयें आत्मा खचू देऊ नये कधी |

आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला ||


किती सोप्या भाषेत त्यांनी आत्मनिर्भरतेचा संदेश दिलेला आहे.


एखादी गोष्ट सुरू करून ती अंतिम ध्येयापर्यंत यशस्वी रित्या पोहोचवणं किंवा करणं हा आत्मविश्वास, त्यासाठी लागणारे बळ, त्यासाठी लागणाऱ्या मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द आणि कुणावरही मानसिकरीत्या अवलंबून न राहता या सगळ्या गोष्टीतून तरुन जाणे म्हणजेच आत्मनिर्भरता.


तुमच्याकडे वेळ असतो, पैसा असतो, तुमच्याकडे मनुष्यबळ असते; पण एखादी गोष्ट करायची उर्मी तुमच्या आतून यावी लागते.

चार लोकांनी तुम्हाला सांगून हे करा अथवा हे असं करा म्हणून गोष्टी होत नाहीत. ते तुम्ही स्वतः तुमच्या मनाशी ठरवून पार पाडावं लागतं. त्यासाठी लागणारी जिद्द, संयम, चिकाटी हे ही उमजून जागवावं लागेल.

ही आत्मनिर्भरता जर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामासाठी वापरली तर तुम्ही यशस्वी होणारच.

यश-अपयश, यशाच्या मार्गावर जाताना येणाऱ्या अडचणी, त्यांचा आपण पाहिलेला सामना, त्यामुळे आपण शिकलेला धडा हे सगळे तुम्हाला वेगळा अनुभव देतात आणि  त्या त्या यशाचा मिळणारा आनंद म्हणजे एक वेगळीच नशा असते.


माननीय मोदींनी आपल्याला आत्ता पर्यंत इतक्या छान छान संज्ञांची आठवण करून दिलेली आहे..

"संयम ही संकल्प"

"संकल्प से सिद्धी" 

आणि 

"आत्मनिर्भर भारत"


पूर्ण राष्ट्र आत्मनिर्भर व्हायचं असेल तर त्यातली ही कोटींमध्ये जनगणना आहे, प्रत्येकानी आत्मनिर्भरतेचा थोडा तरी अंश आपल्यात अंगिकारावा. 

आपण जे काम ठरवू त्याची व्यवस्थित आखणी करून सुरुवात करणं, ध्येयाप्रत जाताना लागणाऱ्या काही लोकांची मदत घेणे आणि सगळ्यांना एकजुटीने घेऊन त्या ध्येयापर्यंत नेणे; ही आत्मनिर्भरता जर सगळ्यांनी अंगी बाणवली तर एक विशाल राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमा जगाच्या नकाशात नक्कीच उजळून निघेल.


तुमच्या मनातील  आत्मनिर्भरतेचा अंकुराला चांगल्या सकारात्मक विचारांचे खत पाणी घाला; नवीन काहीतरी ध्येय ठरवा आणि प्रगती करा.

तरच होईल आपला भारत आत्मनिर्भर.


सुरक्षित रहा, आत्मनिर्भर व्हा.

No comments:

Post a Comment

पावसाळा..तब्येत सांभाळा!

जुलै सुरू झालाय.. पाऊस जोर धरतोय.. निसर्गाच्या हिरव्या व निळ्या रंगाच्या उधळणी बरोबर वातावरणात बदल होत आहेत. पावसाळा ऋतु पचन मंदावणारा व हम...